‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा जोरदार प्रतिहल्ला; पाकिस्तान व पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

👇Click and Listen

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा जोरदार प्रतिहल्ला; पाकिस्तान व पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त

नवी दिल्ली | ६ मे २०२५ जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी (७ मे) पहाटे १:४५ वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.

ही लक्ष्यित कारवाई मुरिदके आणि बहावलपूर या भागांमध्ये झाली, जे अनुक्रमे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे मुख्य बालेकिल्ले मानले जातात.

भारतीय सैन्याच्या या निर्णायक कारवाईत, अशा तळांना लक्ष्य करण्यात आले जे भारतात दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करत होते.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई अत्यंत संयमित, मर्यादित व सावधगिरीने करण्यात आली असून पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांना इजा पोहोचवली नाही. “भारताने लक्ष्य निवडताना आणि कारवाई करताना अतिशय संयम दाखवला आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्याचा पार्श्वभूमी

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या अमानुष हल्ल्यात २५ भारतीय आणि १ नेपाळी नागरिक अशा २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या घटनेमुळे देशभरात संताप उसळला होता आणि केंद्र सरकारवर कठोर पावले उचलण्याचा दबाव वाढला होता.

पाकिस्तानची प्रतिक्रिया

या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले, “ही युद्धाची कृती आहे आणि पाकिस्तानला त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमचे लष्कर आणि नागरिक सज्ज आहेत.”

पंतप्रधान मोदींचा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्यानंतर घेतलेल्या बैठकीत ठाम शब्दांत सांगितले, “जो कोणी या हल्ल्यामागे आहे, त्याला पृथ्वीच्या शेवटच्या टोका पर्यंत जाऊन अशी शिक्षा देण्यात येईल जी त्याच्या कल्पनेपलीकडची असेल.”

भारत सरकारच्या माहितीनुसार, देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये “शत्रूच्या हल्ल्याच्या परिस्थितीत नागरी संरक्षण” यासाठी मॉक ड्रिल सुरू असून अशा संवेदनशील काळात भारताने ही कारवाई केल्याने तिचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

आगामी माहिती

‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भातील अधिक तपशील भारत सरकारकडून बुधवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहेत.

Goa TV 24
Author: Goa TV 24

Leave a Comment