निसर्गाचा कोप, वायनाड भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू.
वायनाड भूस्खलनामुळे सर्वाधिक नुकसान चुरलमाला आणि मुंडक्काई गावात झाले आहे. भूस्खलनामुळे या दोन गावांचा काही भाग वाहून गेला आहे. येथे रिसॉर्टसह अनेक घरे आणि काही निवासस्थान भूस्खलनाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. नदीवरील पूल तुटल्यामुळे बचाव पथकाला मुंडक्कयी गावात पोहोचता आलेले नाही. प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टरही तेथे पोहोचू शकत नाहीत. चुरल माला शहरात पूल कोसळल्याने सुमारे 400 कुटुंबे अडकली.
केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाने मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर शेकडो लोक अजूनही अडकून पडले आहेत. दरम्यान, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भूस्खलनग्रस्त वायनाडला मदत आणि बचावासाठी सैन्य तैनात करण्यास सांगितले. वायनाडमध्ये लष्कराचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
पंतप्रधान मोदींपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपर्यंत अनेक नेत्यांनी वायनाडमधील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.










